Untitled 1
योग्यासाठी तपश्चर्या आवश्यक
मच्छिंद्रनाथांनी बद्रिकाश्रमात बारा वर्षे तपाचरण केले. योग्य वेळ आल्यावर
त्यांची आणि भगवान दत्तात्रेयांची गाठ पडली. दत्तात्रेयांनी त्यांना शिष्य म्हणून
स्वीकारले. त्यांना दीक्षा दिली आणि सर्व प्रकारच्या विद्या शिकवल्या. गंमत बघा की
खरंतर मच्छिंद्रनाथ म्हणजे अवतारी सत्पुरुष. मच्छिंद्रनाथांनी आपल्या जन्मापूर्वीच
मच्छीच्या पोटातूनच गुढातीगुढ आणि योगीगम्य असे शंकर-पार्वती संभाषण श्रवण केले
होते. त्याचे आकलनही त्यांना झाले होते. परंतु तरीही त्यांनी तब्बल बारा वर्षे
तपाचरण अंगिकारले.
आता त्यांच्याच शिष्योत्तमाचे उदाहरण घ्या. ज्या विद्या भगवान दत्तात्रेयांनी
मच्छिंद्रनाथांना प्रदान केळ्या होत्या त्या सर्व विद्या त्यांनी गोरक्षनाथांना
शिकवल्या. गोरक्षनाथ तेंव्हा बारा वर्षांचे होते. आपल्या गुरूने दिलेले ज्ञान
त्यांनी लीलया आत्मसातही केले होते. परंतु मच्छिंद्रनाथांना असं लक्षात आलं की एवढी
प्रकांड विद्या आत्मसात करूनही गोरक्षनाथांच्या ज्ञानाचा प्रकाश म्हणावा तसा लखलखीत
झळकत नव्हता.
भगवान दत्त्तत्रेयांनी दिलेली विद्या जी मच्छिंद्रनाथांना मिळाली तीच
गोरक्षनाथांनाही मिळाली. मग त्यात न्यूनत्व कुठे आले? गोरक्षनाथांची विद्या
प्रखरपणे झळाळत का नव्हती? या प्रश्नांची उत्तरे मच्छिंद्रनाथांना एक दिवस मिळाली.
भारतभर तीर्थे भ्रमण करत करत मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ बद्रीकारण्यात पोहोचले.
भगवान शंकरापुढे नतमस्तक होऊन तेथेच काही काळ विसावले. क्षेमकुशल विचारल्यावर
भगवान शंकर मच्छिंद्रनाथांना म्हणाले - "हे बघ. तू गोरक्षबाळाला सर्व विद्यांत
पारंगत केले आहेस ते योग्यच आहे. त्यानेही सर्व विद्या आत्मसात केलेल्या आहेत.
परंतु त्याच्या हातून कोणतेही तपाचरण घडलेले नाही. जोवर योग्याच्या हातून तपश्चर्या
घडत नाही तोवर त्याच्या ज्ञानाला झळाळी येत नाही. तू त्याला माझ्याकडे तपश्चर्येला
बसव आणि खुशाल तीर्थाटनाला जा. मी त्याची सगळी काळजी घेईन."
मच्छिंद्रनाथांना जे प्रश्न पडले होते त्यांची उकल झाली होती. तपश्चर्येशिवाय
गोरक्षनाथांच्या ज्ञानाला झळाळी कदापि येणार नाही हे त्यांना कळून चुकले.
गोरक्षनाथांचे वय लहान त्यामुळे कनवाळू मच्छिंद्रनाथांनी त्याला कठोर तपाचरण करायला
लावले नव्हते. आता प्रत्यक्ष आदिनाथ "मी त्याची काळजी घेईन" असे सांगत असल्यामुळे
त्यांना हायसे वाटले. पुढे गोरक्षनाथांनी बारा वर्षे उग्र तपश्चर्या केली आणि
आपल्या ज्ञानाच्या प्रखर तेजाने अवधा भारत नाथ-विज्ञानाने उजळून काढला.
नवनाथांची चरित्रे अभ्सासल्यास आपल्याला असे आढळून येते की अवतारी आणि अयोनीसंभव
असूनसुद्धा त्यांनी बारा वर्षे कठोर तपाचरण केलेले होते. हे सगळं सांगण्याचे
तात्पर्य हे की अजपा योगसाधकांनी देखील हा आदर्श घेणे गरजेचे आहे. अष्टांग योगातील
यम-नियमांत तपाचा अंतर्भाव केलेला आहे तो त्याचकरता. आजकाल अध्यात्माविषयी पोकळ
बडबड अनेक लोकं करताना दिसतात. स्वतःच्या साधनेची बैठकही अजून नीट बसलेली नाही तोच
दुसऱ्याला पुस्तकी ज्ञान पढवायला तयार. जो खरा साधक आहे त्याने अशा प्रकारच्या
वर्तनापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. साधकाने सर्वप्रथम साधनेवर आणि तपाचरणावर
लक्ष केंद्रित केले पाहिजे.
नाथ पोथीत एके ठिकाणी छान सांगितलंय -
परी अंतरी पात्र कच्चेपणीं । वरी रंग दावी लखलखोनी ।
जेवीं वाढीव ब्रह्मज्ञानीं । परी अंतरीं हिंगो ॥
बोलतां ज्ञानी विशेष । कीं प्रत्यक्ष मिळाला स्वरुपास ।
ऐसें भासलें तरी ओंफस । परी अंतरीं हिंगो ॥
एखादे कच्चं मडकं रंगरंगोटी करून लखलखीत केलं तरी ते जोवर ते भट्टीत नीट भाजलं
जात नाही तोवर कच्चं ते कच्चंच रहातं. त्याचप्रमाणे एखादा कच्चा योगमार्गी वरकरणी
कितीही म्हणाला की "मी ज्ञानी आहे" तरी ते शेवटी बोलाची कढी आणि बोलाचाच भात.
येऊ घातलेलं दिपवाळीचं पर्व सर्व वाचकांच्या साधनामार्गाला लक्ख उजळून काढो अशी
प्रार्थना आदिनाथाच्या चरणी करून लेखणीला येथेच विराम देतो.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम