नवरात्रौत्सव आणि कुंडलिनी
लेखक : बिपीन जोशी
तुम्हा सर्वांना नवरात्रीचा उत्सव साजरा का करतात त्यामागील कथा
माहीतच असेल. नवरात्र हा खरंतर कोणत्या एका विशिष्ठ देवीचा सण नाही. तो आहे
आदीशक्तीचा उत्सव. असे सांगितले जाते की या नऊ दिवसांपैकी पहिले तीन दिवस महाकालीची
उपासना करावी, नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस महासरस्वतीची
उपासना करावी. याचा वास्तविक अर्थ काय बरे?
आदिशक्ती त्रिगुणमयी आहे. तम, रज आणि सत्व या गुणांनी ती
सुशोभीत आहे. या जगातील सर्वच गोष्टी या त्रिगुणांच्या सपाट्यात सापडल्या आहेत.
महाकाली तमोगुणाचे, महालक्ष्मी रजोगुणाचे तर महासरस्वती सत्वगुणाचे प्रतीक आहे.
सामान्यतः असा एक समज असतो की साधकाला फक्त सत्व गुणच आवश्यक आहे. रज आणि तम
गुणांची त्याला बिलकूल गरज नाही. पण हे बरोबर नाही. जोवर हा देह आहे तोवर कमी-अधिक
प्रमाणात हे तीनही गुण लागतातच. पण सत्वाचे आधिक्य करून रज आणि तम काबूत ठेवणे हे
साधकाचे परम कर्तव्य आहे.
अज्ञान, आळस, झोप, क्रोध ही तमोगुणाची वैशिष्ठ्ये. महाकालीच्या
रौद्र स्वरूपाची उपासना करण्यामागे तमोगुणापासून निवृत्ती हा उद्देश आहे. तमोगुणाने
भरलेले शरीर-मन आध्यात्ममार्गावर वाटचाल करू शकत नाही. तेव्हा त्यापासून स्वतःला
वाचवावे हे ओघाने आलेच. अर्थात येथे लक्षात ठेवले पाहीजे की थोड्या प्रमाणात तमोगूण
आवश्यक आहे. थकल्यावर झोप घेणे, अन्यायाविरुद्ध लढताना क्रोधाविष्ट होणे
इत्यादींमधे तमोगुणाचा हातभार असतोच.
कार्य, काम, इच्छा-आकांक्षा ही रजोगुणाची वैशिष्ठ्ये आहेत.
महालक्ष्मी ही रजोगुणाची तृप्ती करणारी देवी आहे. म्हणूनच रजोगुणाचे संतुलन करण्यास
तीची उपासना करतात. पैसा, सुख, समृद्धी कोणाला नको असते. भौतिक सुखांची आस आणि
त्यांची पुर्तता हे रजोगुणामुळे साधते. तुम्ही रोज नोकरीवर जाता आणि काम करून
तुमच्या कुटुंबासाठी पैसा कमवता ते रजोगुणामुळेच.
तम आणि रज हे गुण रोजच्या जीवनात आवश्यक असले तरी ते
प्रमाणाबाहेर वाढून चालत नाहीत. त्यांमधे असमतोल झाल तर मग आळस, हावरटपणा इत्यादी
अवगूण प्रगट होतात. या दोन गुणांना ताब्यात ठेऊन जेव्हा सत्वगुण प्रबळ होतो तेव्हा
तो अध्यात्मजीवनास पोषक ठरतो. सत्वगुणाचे प्रतीक असलेल्या महासरस्वतीची उपासना
करण्यामागे हाच हेतू आहे. सत्वगुणामुळे दया, ज्ञान, परोपकार असे गुण वाढीस लागतात.
गाडीतून जात असताना एखाद्या जख्खड म्हातार्या भिकार्याला पैसे द्यावे अशी इच्छा
तुम्हाला होते ती या सत्वगुणामुळेच.
केवळ उत्सवापुरतेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीची उपासना
करून काही उपयोग नाही. त्यामागचे गुढ तत्व समजून घेतले पाहिजे. आदिशक्ती या शरीरातच
कुंडलिनी रूपाने स्थित आहे. कुंडलिनीही अर्थातच त्रिगुणात्मक आहे. कुंडलिनीची
उपासना केल्यास या तीनही देवीरूपांची उपासना केल्याचे फळ मिळेल यात शंकाच नाही.
कुंडलिनीची उपासना कशी करावी? गुरूप्रदत्त साधनामार्गाचा निरंतर अभ्यास करूनच ही
उपासना शक्य आहे. तुम्ही नामस्मरणाचा मार्ग चोखाळा वा ध्यानमार्ग वा हठयोग
चोखाळा. जगदम्बा कुंडलिनीला शरण गेल्याशिवाय गुणांचा समतोल साधणे आणि यथावकाश गुणातीत अवस्थेचा
अनुभव घेणे शक्य नाही.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम