Untitled 1
दिवाळीच्या शुभेच्छा आणि एक गोष्ट
आमच्या सर्व वाचकांना आणि योग साधकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला
आणि तुमच्या कुटुंबीयांना आयू, आरोग्य, एश्चर्य आणि आनंद प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
दीपावलीच्या शुभेच्छांबरोबरच गोरक्षनाथांची एक छोटी गोष्ट सांगणार आहे...
मच्छिंद्रनाथ योगी असूनसुद्धा दैववश मैनावती राणी बरोबर संसारात गुंतले. गोरक्षनाथांनी आपल्या गुरूला सोडवून आणण्याचा चंग बांधला. मैनावती राणी
स्त्रीराज्याची स्वामीनी. त्यामुळे राज्यात फक्त स्त्रियांना प्रवेश. गोरक्षनाथांनी
मग स्त्रीवेश धारण करून एका नृत्यांगनेबरोबर स्त्रीराज्यात प्रवेश केला.
मच्छिंद्रनाथ राणीबरोबर संसारसुख भोगण्यात रंगले होते. गोरक्षनाथांनी मृदुंग
वादनाची जबाबदारी स्वीकारली. राजसभेत मच्छिंद्रनाथ राणीबरोबर नृत्याचा आस्वाद
घेण्यासाठी आले. नृत्य सुरू झाल्यावर
गोरक्षनाथांनी मृदुंगावर "चलो मच्छिंद्र गोरख आया" असे बोल वारंवार काढण्यास
सुरवात केली. मच्छिंद्रनाथ चपापले. आता आपला शिष्य आपल्याला घेऊन जाणार आणि आपला
सुखोपभोग संपणार हे त्यांना लक्षात आले. राणीने आणि मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना
नाना प्रकारे भुलवण्याचा प्रयत्न केला पण गोरक्ष काही केल्या बधले नाहीत.
मच्छिंद्रनाथांना घेऊन एक दिवस त्यांनी स्त्रीराज्याला रामराम ठोकला. मच्छिंद्रनाथ
सोडूना जात असताना राणीला खूप दुःख झाले. तीने प्रेमाने एक सोन्याची वीट
मच्छिंद्रनाथांच्या झोळीत टाकली. कधी गरज लागली तर वापरता येईल या विचाराने
मच्छिंद्रनाथांनी ती ठेऊन घेतली. गोरक्षनाथांना या गोष्टीचा पत्ताच नव्हता.
मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ स्त्रीराज्य सोडून जंगलात प्रवेशले. मच्छिंद्रनाथ
क्षणोक्षणी घाबरेघुबरे होऊन, आपली झोळी उराशी कवटाळून गोरक्षनाथांना विचारू लागले
की येथे चोर-लुटारूंचे भय तर नाही ना. गोरक्षांना संशय आला. योगशिरोमणी असलेल्या
आपल्या गुरूंना अचानक भय कसे काय वाटू लागले हे त्यांना कळेना. एके ठिकाणी
मच्छिंद्रनाथ पाणी पिण्यासाठी तलावावर गेले. ते गेल्यावर गोरक्षनाथांनी त्यांची
झोळी उघडून पाहिली आणि भयाचे कारण त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ती सोन्याची वीट
जंगलात भिरकावून दिली आणि त्याच्याच वजनाचा एका दगड झोळीमध्ये ठेवला. मच्छिंद्रनाथ
परतल्यावर गुरू-शिष्य पुढच्या प्रवासाला लागले. मच्छिंद्रनाथ परत परत गोरक्षाला
चोरभयाविषयी विचारू लागले. गोरक्ष हसून उत्तरले, "गुरूजी! आता कसले भय? भय तर मागेच
राहिले." गोरक्षनाथांच्या उत्तराने मच्छिंद्रनाथांना संशय आला. त्यांनी झोळी उघडून
पाहिली तर सोन्याची वीट गायब. ते खूप संतापले. गोरक्षाला "तू माझे सोने चोरलेस" असे
म्हणून शिव्याशाप देऊ लागले. गोरक्ष म्हणाले, "गुरूजी! आपणा कोण आहोत ते लक्षात
घ्या. आपण योगी. आपल्याला ही सोन्याचांदीची ब्याद कशाला पाहिजे." तरी
मच्छिंद्रनाथांना काही पटेना. ते अधिकच रागावू लागले. भ्रमिष्टासारखे "माझे सोने
गेले हो" असा आक्रोश करू लागले. ते पाहून गोरक्षांनी त्यांना हाताला धरून बसवले आणि
स्वतः समोरच्या पर्वतावर चढले. पर्वतमाथ्यावर पोहोचल्यावर त्यांनी तेथे लघुशंका
केली आणि काय आश्चर्य तो अख्खा पर्वतच सोन्याचा झाला. गोरक्ष खाली उतरून आपल्या
गुरूकडे आले. म्हणाले, "गुरूजी! तुम्हाला पाहिजे तेवढे सोने घ्या." आपल्या शिष्याचे
योगासामर्थ्य आणि वैराग्य पाहून मच्छिंद्रनाथांनी अत्यानंदाने गोरक्षनाथांना मिठी
मारली. पर्वतावर थुंकत ते म्हणाले, "गोरक्षा! सोन्यासारखा शिष्योत्तम माझ्याकडे
असताना मला अन्य सोन्याची गरजच काय? माझी शिकवण तुला कितपत कळली आहे त्याची परीक्षा
घ्यावी म्हणून मी हे सर्व केले." गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांच्या चरणावर मस्तक
ठेवले.
दिवाळी म्हणजे आनंदाचा, मौजमजेचा आणि एश्चर्याचा सण.
साधारणतः हे एश्चर्य नवीन खरेदी, नवे कपडे, सोनं-चांदीची खरेदी, रोषणाई, फटाके अशा
प्रकाराने साजरे केले जाते. ज्यांना दिवाळी अशा प्रकारे साजरी करायची असेल त्यांनी
जरूर करावी. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे पण त्याचबरोबर आपापल्या
आयुष्यात, आपापल्या कार्यक्षेत्रात गोरक्षनाथांसारखे "गुणांचे ऐश्चर्य" कसे कमावता
येईल हे ही आपण सर्वांनी पाहायला हवे. त्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. जगद्नियंता
सदाशिव आपणा सर्वांना तशी प्रेरणा देवो हीच त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम